पुणे महापालिकेवर भगवा फडकवून बंडखोरांना उत्तर द्यायचंय -सचिन अहिर

234 0

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीमध्ये जोमाने काम करून पुणे महापालिकेवर भगवा फडकवून बंडखोरांना उत्तर द्यायचे आहे. पुणे शिवसेनेकडून ही भेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देण्याचा निर्धार पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांनी पुण्यातील मेळाव्यात व्यक्त केला.

सचिन अहिर म्हणाले की, सध्या राज्यात मान्सून सेल सुरू आहे. त्यामुळे काही लोक जात आहेत. मात्र, काही लोकांच्या जाण्याने शिवसेनेला फरक पडणार नाही. कारण शिवसेना ही सामान्य शिवसैनिकांची आहे. सध्या चाललेले सत्तानाट्य जनता पाहत आहे. त्यामुळे वेळ आल्यानंतर मत रूपांतून बंडखोरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात अहिर यांनी केला. करोना काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं त्याचा गौरव जागतिक पातळीवर केला गेला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे देशाचे नेतृव करू शकतात याची भीती केंद्रातील नेतृत्वाला झाल्याने उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व संपवण्याचं कट कारस्थान करण्यात येत आहे. मात्र, शिवसैनिक हे होऊ देणार नाही असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, ज्याच्या जीवावर निवडून आणले त्याच्यावर खालच्या पातळीवर बंडखोर टीका करत आहे. हे दुर्दैवी असून पुढील काळात बंडखोर कोणाच्या नेतृत्वात निवडणुका लढणार हे स्पष्ट करावं असं आव्हानदेखील अहिर यांनी बंडखोरांना केलं.
पुणे शहर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकाचा भव्य मेळावा कुंदन गार्डन मंगलकार्यालय बाणेर इथे पार पडला. यावेळी सर्व शिवसैनिकांनी यापुढेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानण्याचा निर्धार केला.यावेळी संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शशिकांत सुतार, चंद्रकांत मोकाटे यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो ‘ उद्धव ठाकरे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
डॉक्टर नीलम गोऱ्हे म्हणाल्या,मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे भाजपचे नेते म्हणत असले तरी त्यांना मनावर दगड ठेवायला लावणारे त्यांचेच पक्षश्रेष्ठी आहेत. या पक्षश्रेष्ठींनी किरिट सोमय्या, नवनीत राणा यांच्या सारख्यांना शिवसेनेच्या विरोधात काम करायला लावले. दोन तृतीयांश आमदार फुटले असले तरी त्यांना वेगळा गट होऊ शकत नाही, हे आमदारांना सांगितले नाही. त्यामुळे आता त्यांना कोणत्या तरी पक्षात जावेच लागेल. मनसेची परिस्थिती ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’ अशी आहे. राज ठाकरे यांचा भाजपने अनेकदा वापर करून घेतला आहे. शिवसेनाप्रमुखांप्रमाणे भगवी शाल पांघरण्याचे नाटक उद्धव ठाकरे यांना करावे लागत नाही, अशी टीका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!