शिवसैनिकांनो, प्रतिज्ञापत्रावर सांगा… ‘कटर’ की कट्टर..?’

316 0

आधी हाती शिवबंधन बांधून आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, असं दाखवून देणं आणि आता आम्ही एकनिष्ठ शिवसैनिक आहोत, असं प्रतिज्ञापत्रावर लिहून देणं..! आपण पक्ष आणि पक्षप्रमुखांशी एकनिष्ठ आहोत, असा विश्वास वारंवार द्यावा लागणं ही कट्टर शिवसैनिकांसाठी अग्निपरीक्षा ठरतेय.

…………………………

शिवसेना : शिवसैनिकांनो, प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या की, माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे.

भाजप (प्रवीण दरेकर) : शिवसेनेनं सर्वांत पहिल्यांदा संजय राऊतांकडून एकनिष्ठतेचं पत्र लिहून घ्यावं. कारण ते कधीही राष्ट्रवादीचं सदस्यत्व घेऊ शकतात. त्यामुळं ‘मी राष्ट्रवादीत जाणार नाही, असं त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून घेण्यात यावं.

मनसे (संदीप देशपांडे): उद्या समजा एखाद्या शिवसैनिकानं पक्षप्रमुखांकडं तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्त्वाचे विचार सोडणार नाहीत, असं प्रतिज्ञापत्र मागितलं तर त्यांच्याकडून ते दिलं जाईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

शिंदे गट (दीपक केसरकर) : पक्षाकडून आता प्रतिज्ञापत्र घेतली जातायत. लोकांना प्रेमानं बांधवं लागतं. प्रेमाचं बंधन बाळासाहेबांनी आम्हाला बांधलं. प्रतिज्ञापत्र देणं म्हणजे कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवणं होय.
………………………..

मी प्रतिज्ञापत्रावर असे लिहून देतो की…

‘माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर (संविधान) पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. तसेच वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे आणि या निष्ठेची पुनश्च पुष्टी करीत आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मी सदैव कायर्रत राहीन, अशी ग्वाही देतो.’
………………………

… ही तर शिवसैनिकांच्या एकनिष्ठतेची अग्निपरीक्षा !

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळं जे उरलेत ते तरी शिवसेनेशी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत का याची खातरजमा करण्यासाठी पक्षाच्या आमदारांपासून उपशाखाप्रमुखांपर्यंत प्रतिज्ञापत्र स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती समोर येतेय. सलग 30-40 वर्षे शिवसेनेचं काम करणाऱ्या शिवसैनिकांच्या एकनिष्ठतेची परीक्षा घेण्याची वेळ पक्षप्रमुखांवर यावी हे सेनेला, सेनेच्या पक्षप्रमुखांना आणि तमाम शिवसैनिकांना आत्मचिंतन करायला लावणारं आहे. अर्थात, शिवसैनिकांनी शिवबंधन बांधून आणि प्रतिज्ञापत्रावर लिहून देऊनही कोण ‘कट्टर’ आणि कोण ‘कटर’ हे येणारा काळच ठरवेल.

– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!