शिवसेना कुणाची ? ठाकरेंची की शिंदेंची ? (संपादकीय)

256 0

शिवसेना कुणाची ? ठाकरेंची की शिंदेंची ? हाच सवाल आज अवघ्या महाराष्ट्रासमोर उभा ठाकलाय. शिवसेना कुणाची हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला तर उत्तरं मिळेल बाळासाहेबांची ! हाच प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारला तर उत्तर मिळेल बाळासाहेबांची ! आणि शेवटी हाच प्रश्न तमाम शिवसैनिकांना विचारला तर पुन्हा तेच उत्तर मिळेल शिवसेना बाळासाहेबांची ! मग, ही शिवसेना बाळासाहेबांचीच असताना शिवसेना नक्की कुणाची हा प्रश्न का पडला ?
…………………………..
कट्टर शिवसैनिक, शिवसेना नेते आणि विद्यमान नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आणि तिथून हा प्रश्न खऱ्या अर्थानं उभा राहिला. एक-दोन नव्हे तर शिवसेनेचे तब्बल 40 आमदार सोबत घेऊन शिंदेंनी ‘शिंदे गट’ तयार केला आणि स्वपक्षालाच धक्का दिला. गेली पाच दिवसांपासून हा शिंदे गट सूरतमार्गे गुवाहाटीत जाऊन बसलाय. ‘मविआ सरकारमधूनबाहेर पडा आणि भाजपशी युती सत्ता बनवा, अशी ताठर भूमिका शिंदे गटानं घेतलीये तर ज्यांनी ‘मातोश्री’वर, ठाकरे कुटुंबावर आरोप केले त्या भाजपासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसणार नाही, अशी कठोर भूमिका शिवसेनेनं घेतलीये.

आधी आवाहन मग आव्हान

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांना आधी आंजारून-गोंजारून पाहिलं, भावनिक साद घालून पाहिलं पण त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचं दिसून येताच ठाकरी शैलीत आव्हान दिलं. आता परत येताय की कारवाई करू, असा सज्जड दमच भरला. एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांविरुद्ध निलंबनाच्या नोटिसा, त्यानंतर मंत्रिपदावरून हटवण्याच्या हालचाली आणि बरंच काही… पण शिंदे गट काही या नोटिशी-कारवायांना घाबरल्याचं चित्र सध्या तरी दिसत नाही.

शिवसैनिक संतापले; बंडखोरांचे कार्यालय फोडले, पोस्टर फाडले

शिवसेना नेते संजय राऊत यांनी वेळप्रसंगी शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर काही खरं नाही, असं वक्तव्य करताच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातील शिवसैनिक पेटून उठले आणि रस्त्यावर उतरले. कुठं कार्यालयांची तोडफोड करण्यात आली, पोस्टर फाडले गेले तर कुठं प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले.

शिवसेना-शिंदेंसेना यांच्यात वाद; भाजपाचं मात्र वेट अँड वॉच !

केव्हा तरी पहाटे झालेल्या शपथविधीचा कटू अनुभव गाठीशी असल्यानं आता ताकही फुंकून प्यायचा, अशी भूमिका भाजपनं घेतलीये. शिंदे गटाकडून आमच्याकडं अजून तरी कोणताही प्रस्ताव आलेला नाही शिवाय शिंदे गटाचं बंड हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे, असं म्हणत भाजपची नेतेमंडळी वेळ मारून नेत आहेत किंवा ‘करेक्ट’ कार्यक्रम करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहात आहेत.

एकूणच काय तर मविआ सरकारच्या मुख्य पक्षातील हे बंड लवकर थंड केलं गेलं नाही तर महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापत जाणार हे नक्की !

 

 

 

 

संदीप चव्हाण
– वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!