पाणी ही शरीरासाठी अत्यावश्यक गोष्ट असते. शिवाय हे पाणी तांब्याच्या भांड्यातून प्यायल्यास त्याचा शरीराल खूप फायदा होतो हे सिद्ध झाले आहे. पण असे पाणी जास्त प्रमाणात प्यायल्यास शरीरासाठी ते अपायकारक ठरते. त्यासाठी असे पाणी पिण्याचे काही नियम आहेत ते आपण जाणून घेतले पाहिजेत.
कधीकधी चांगलं खाण्यापिण्याच्या सवयी लावून घेताना ते किती खावं किंवा प्यावं याकडे आपण दुर्लक्ष करतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे तब्येतीसाठी चांगलं असलं, तरी ते मर्यादित प्रमाणातच प्यायलं पाहिजे.
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, तांब्याच्या भांड्यात रात्रभर साठवलेलं पाणी सकाळी प्यावं. हे पाणी सकाळी प्यायल्यानं शरीराला त्याचे चांगले फायदे मिळतात; मात्र झोपताना रात्रीच्या वेळी हे पाणी प्यायलं किंवा जेवणानंतर हे पाणी प्यायलं, तर त्यामुळे शरीराचं नुकसान होऊ शकतं.
पाणी ठेवलेलं तांब्याचे भांडे खाली जमिनीवर ठेवू नये. तसं केल्यानं तांब्याची शुद्धता कमी होते. त्यामुळे हे भांडं एखाद्या लाकडी पृष्ठभागावर ठेवावं. यामुळे तांब्याचे संपूर्ण गुणधर्म पाण्यात उतरतील व ते पाणी आरोग्याला फायदेशीर ठरेल.