मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये भूकंप झाला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे. एकूणच या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बंडखोर आमदारांनी त्वरित परत यावे असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र या इशाऱ्याचा बंडखोर आमदारांवर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. या उलट आणखी काही आमदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होत असल्याचे दिसून येत आहे.
पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन बडतर्फ केलं आहे. एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेनं हा सर्वात मोठा निर्णय घेतला. अजय चौधरी यांच्याकडे शिवसेनेच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र अजय चौधरी यांची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
त्यानंतर आज मुंबईतील वर्षा बंगल्यावर संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला हजर राहा अन्यथा अपात्र ठरवू, असं पत्र बंडखोर आमदारांना पक्षाकडून पाठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यासंदर्भातील पत्र शिवसेनेच्या सर्व आमदारांना पाठवले आहे. मात्र त्या पत्रालाही या आमदारांनी केराची टोपली दाखवली आहे.
एकूणच या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करणार की बंडखोर आमदारांवरील कारवाई अधिक कठोर करणार हे पाहावे लागेल.