हृदयात राम आणि हाताला काम हेच चित्र देशात दिसत आहे, भाडोत्री सैन्य हा प्रकार आहे ? मग भाडोत्री राजकारणासाठी सुद्धा टेंडर काढा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अग्नीपथ योजनेवरून हल्लाबोल केला.
आमदार, खासदार, नगरसेवक या सगळ्यांना एकत्र ठेवणं ही लोकशाहीच आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजचं हे चित्र आहे की आमदारांना हॉटेलमध्ये ठेवून बडदास्त ठेवली आहे. हे जे चित्र मला दिसतंय ते विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरही दिसलं पाहिजे. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं.
मी चिंता करत बसलो नाहीये, कारण मी चिंता करत बसलो तर शिवसेना प्रमुखांनी जे माझ्या धमन्यांमध्ये सळसळतं रक्त भिनवलं आहे त्याचा उपयोग काय? राज्यसभेच्या वेळी आपलं एकही मत फुटलेलं नाही. मग फुटलं कोण? तो अंदाज लागलेला आहे. विधान परिषदेच्या वेळी फाटाफूट होणार नाही कारण गद्दार मनाचा कुणी इथे राहिलेला नाही. कितीही फाटाफूट झाली तरीही शिवसेना मजबुतीने उभी राहिली आहे. असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.