मुंबई- नाट्यमय घडामोडीनंतर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला. या पराभवानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले आहे. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. घोडेबाजार उभे होते त्यांची सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. अपक्ष आमदारांची मतं फुटल्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला दगा देणाऱ्या आमदारांची नावं जाहीरपणे सांगितली.
संजय राऊत म्हणाले, ” राज्यसभा निवडणुकीत आम्ही निसरड्या वाटेवर होतो. ज्या लोकांनी आम्हाला शब्द दिला होता ते पाळले गेले असते तर शिवसेनेच्या उमदेवाराचा पराभव झाला नसता. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मते, त्यानंतर करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंगे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मते आम्हाला मिळाली नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं मिळाली.
संजय राऊत म्हणाले की, घोडेबाजारातील घोड्यांमुळं सरकारवर फरक पडणार नाही. काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले हे घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात.पण विकले जाणारे लोकं कुणाचेच नसतात. फार हरभऱ्याच्या झाडावर चढू नका, हरभरे अपक्षांनी खाल्ले आहेत, असा टोलाही राऊतांनी विरोधकांना लगावला. समोरच्यांनी केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासला असाही आरोप संजय राऊत यांनी केला. आमचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. पण याचा अर्थ भाजपने दैदिप्यमान विजय मिळवला, असे होत नाही असेही संजय राऊत म्हणाले.