मोठी बातमी ! भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे, राज ठाकरे यांचा मनसैनिकांना नवा आदेश

371 0

मुंबई- मशिदीवरील भोंग्यांच्या विषयाला पुन्हा हवा मिळाली आहे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचाय, असं म्हणत राज ठाकरेंनी या विषयाबाबत आपली आक्रमक भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी भोंग्याविषयी आपली भूमिका मांडली आहे. हे पत्र कार्यकर्त्यांनी राज्यातील घराघरात द्यावं असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं आहे.

राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात घेतलेल्या सभेत भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार असून ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचंय असंही त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिलेलं पत्र आता समोर आलं आहे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. आपला विचार लोकांपर्यंत पोहचायला हवा, व्यापकत लोकसहभागाशिवाय हे आंदोलन यशस्वी होणार नाही, माझं पत्र घराघरात पोहचवा, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय.

काय म्हटलंय या पत्रात ?

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे.

ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.

Share This News
error: Content is protected !!